Friday 27 June 2014

एक तरी वारी अनुभवावी...

शतकामागुन शतकं उलटली. पिढ्यांमागुन पिढ्या बदलल्या. बदलांचा हा रेटा गावांचे, माणसांचे चेहरे बदलतो. नवीन काही जन्माला येत, जुन काही लयाला जातं. या सार्‍यामध्ये परंपरेची नाळ मात्र शाबूत असते. ती शतकांमागून शतकांना जोडत असते अन् पिढ्यांमागुन पिढ्यांना साधत असते. ही परंपराच मग एक सांस्कृतिक ठेवा बनते आणि जिवाभावाने जपली जाते. आपल्या महाराष्ट्रालाही असाच एक भव्य आणि उदात्त सांस्कृतिक ठेवा लाभला आहे. ज्ञानियाच्या ओव्यांचा, तुकोबा/नामदेवांच्या अभंगाचा आणि या गजरात न थकता चालणार्‍या "पंढरीच्या वारीचा".

जाऊ देवाचिया गावा, घेऊ तेथेचि विसावा
देवा सांगु सुख दुःख, देव निवारील भूक
"निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम", "ज्ञानोबा माऊली तुकाराम" "पुंडलीक वरदा हारी विठठल"चा जयघोषात आणि आसमंत व्यापून टाकणारा टाळ-मृदुंगांचा गजरात पावलं देवाचिया गावा, पंढरपुरास निघाली. असं म्हणतात कि "एक तरी ओवी गुणगुणावी" प्रमाणेच "एक तरी वारी अनुभवावी". गेल्या वर्षी प्रथमच वारी अनुभवली आणि या वर्षी पाऊले आपोआपच दिंडीच्या मार्गावर वळली. मी अजुनही तुकोबाच्या देहुला, ज्ञानोबाच्या अलंकापुरीला आणि विठुरायाच्या वैकुंठनगरीला गेलो नाही, तरीही मग हि ओढ नक्की कशाची? कारण माहित नाही मात्र हि अनामिक ओढ जबरदस्त होती. माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सासवडहुन दिवेघाटात भर दुपारी निघालो. पावसाचा पत्ता नव्हता पण हवा मात्र आल्हाददायक होती. माऊलीच्या रथाच्या पुढच्या मानाच्या दिंड्या सासवडकडे निघालेल्या आणि आम्ही झेंडेवाडीच्या पुढे साधारण एक किमी अंतरावर जिथुन घाटातील विहंगम दृष्य त्या जागेवर निघालो. घाटातुन दिंड्या आणि वारकर्‍यांची सासवडकडे वाटचाल झाली होती. माऊलींचा दुपारचा विसावा झेंडेवाडीत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी ओसंडुन वाहत होती. जणु काही या सगळ्या परीसरात वैष्णवांचा महापूर लोटलेला.

टाळ मृदंगाची साथ नामाचा सोहळा
भिवरेच्या तीरी नाचे धुंद संतमेळा
दुरावलो कैसा देवा मीच दर्शनासी
मायबाप विठ्ठला रे कधी भेट देसी

दुपारच्या भर उन्हात पालखीची वाट पाहत उभा होतो. दिवेघाटात लांबवर पालखी येताना दिसली. जसजशी पालखी जवळ येत होती तसतशी मनातली घालमेल वाढत होती. दिवेघाटाच्या वळणावर पालखी जशी जवळ आली तसा हात कॅमेर्‍याऐवजी छातीवर आला आणि नकळतच नमस्कार केला गेला. बाकीचे जेंव्हा फोटो काढत होते तेंव्हा मी मात्र भान हरपुन माऊलींची पालखी पाहत होतो. थोड्या वेळात भानावर आलो. फोटो काढले अन् धावतच खाली जाऊन पुढे झेंडेवाडीच्या रस्त्यावर पालखीची वाट पाहत उभा राहिलो. थोड्यावेळात पालखी अगदी नजरेसमोर आली आणि माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यास गर्दीतून वाट काढत पुढे गेलो. "पाया पडू गेले तव पाउलचि न दिसे..". माझे डोळे पाण्याने का भरले? हे नक्की काय होतंय? माऊलींच्या पादुका दर्शनाने मनावर कसलं संमोहन केलं? टाळ मृदंगाच्या ध्वनीने आणि वैष्णवांच्या या अफाट जनसागराच्या दर्शनाने शरीराला आणि मनाला अचानक टवटवी कशी आली? सारी स्पर्शेंद्रिये गोठून गेली. एका जागी थिजून मी हा सारा सोहळा एकटक पाहत होतो. म्हटलं तर मनाला काहीतरी जाणवत होतं, म्हटंल तर मन जाणीव-नेणीवच्या पलीकडे गेलं होतं. क्षणभर वाटलं आपणही माऊलींच्या पादुकांवर वाहिलेलं एखादं पुष्प व्हाव, मग भलेही दुसर्‍या दिवशी निर्माल्य झालो तरी चालेल. आणि त्यात गैर काय आहे? हे ही एक प्रकारचे समर्पणच नाही का? अंतर्मनाचा शोध घेण्याची हि एक संधी तर नाही ना? कदाचित हा वारी सोहळा माझ्या मनातील मैल धुऊन काढेल. कामक्रोधादी विकारांवर विजय मिळवता येईल. मनात या अशा अनेक विचारांचा कल्लोळ का माजलाय? एकामागुन एक प्रश्नांची मालिका सुरू झाली. आजच हे असे विचार का यावेत? आज मी स्वतःच असा मनात डोकावून का पाहतोय? हा या वारी सोहळ्याचा हा चमत्कार तर नव्हे? दिंडी आणि यातील वारकर्‍यांची निर्मळता माझ्या मलीन, व्याधिग्रस्त मनाला खजील तर करत नाही ना? अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त तर करीत नाही ना? शहरी आयुष्य जगताना मन पूर्णपणे षडरिपूंनी प्रभावित असल्याने भक्तीच्या या असल्या विचारांना थारा नसतो. पण आषाढी वारीत, वैष्णवांच्या संगतीत, टाळ-मृदंगाच्या गजरात, माऊलीच्या पालखीसोबत मनाचा क्षुद्रपणा प्रकर्षाने आत कुठे तरी जाणवायला लागलाय. मनाला कसलीशी आस लागलीय. ह्रदयात खोलवर कुठेतरी टाळ मृदंगाचा गजर वाजतोय. मनाच्या काळोख्या गाभार्‍यात सकारात्मक विचारांची धूनी पेटलीय आणि ती कायमची अशीच पेटत राहु दे हिच त्या विठ्ठल चरणी प्रार्थना.

आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा
दुजी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा
भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला...




 
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा
विठा देखियेला डोळां बाईये वो
वेधले वो मन तयाचियां गुणीं
क्षणभर न विसंबे विठ्ठलरुक्मिणी

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
माऊलींची पालखी

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
वारकर्‍यांची चंद्रभागा

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

प्रचि ४७

प्रचि ४८

प्रचि ४९

प्रचि ५०

प्रचि ५१
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखिलिया
भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंद


प्रचि ५२
तो सावळा सुंदरू कासे पीतांबरू
लावण्य मनोहरू देखियेला...