Sunday 12 June 2016

मंझिल से बेहतर ये रास्ते...


सुट्ट्या आणि पर्यटन म्हटलं की लक्झरी बस, ट्रेन, विमान हि वाहनं आणि त्यांच्या बुकिंगची धांदल आलीच. पण महाराष्ट्रातल्या अंतर्भागातील्या एखाद्या किल्ल्याच्या किंवा जंगलाच्या भटकंतीला जाताना एका विशिष्ट टप्प्याच्या पुढी हि "आपली" वाहनं कामाची नसतात. तिथे त्यांची जागा घेतात ग्रामीण भागातील "हिट" वाहनं. फाईव्ह-स्टार हॉटेलमधलं जेवण आणि धाब्यावरचं जेवण यांच्यात जो फरक आहे, तोच या दोन्ही प्रकारच्या प्रवासांमध्ये आहे. शहरी थाटमाट आणि ऐषोआरामापासुन कोसो दूर असलेल्या या ग्रामीण वाहनांमधून केलेले प्रवास भटक्यांच्या कायम स्मरणात राहतील असेच असतात.

सुट्टीत कोकणातल्या गावी जायचे बेत आखले जातात आणि मग आठवते ती एस.टी! एस.टी.वरचा कोकणप्रवासाचा भार कोकण रेल्वेने हलका केलेला असला, तरी आजही कोकणातल्या अंतर्भागातली गावं गाठायची तर एस.टी.ला पर्याय नाही.


एस.टी.चा हा सुपरिचित लाल डब्बा म्हणजे आजही "गाववाल्या पावन्यां"साठीची जीवनवाहिनीच. या प्रवासात "झुकझुकु आगीनगाडी"ची मजा नसेल, पण पळती झाडही दाखवते आणि मामाच्या गावालाही नेऊन पोहोचवते.


जलदुर्ग पर्यटनला जाताय? मग शक्य तेव्हढं अंतर एस.टी. ने काटुन पुढे एखाद्या बैलगाडीतुन समुद्रकिनारा गाठण्याची आणि तिथुन पुढचा प्रवास मासेमारीच्या बोटीतुन किंवा शिडाच्या होडीतुन करण्याची कल्पना कशी वाटाते? अशी मजल-दरमजल करत इप्सित ठिकाण गाठण हि तर सह्याद्रीतल्या भटकंतीची खासियत.



"केवल मनुष्यप्राणियों के लिए" असं काही या ट्रकवर लिहिलेलं नाही. मग बैलाने हि संधी का सोडावी? त्या निमित्ताने टपावर बसलेल्या प्रवाशांसाठीही जरा वेगळा अनुभव....!

"पिटातले" प्रवासी भवतालचा निसर्ग मनमुरादपणे निरखत निघाले आहेत! मागे बसलेल्या (कि उभ्या?) मंडळींना हि लक्झरी नाही!

तालुक्याच्या गावास्न आपली वाडी आट-धा किलोमीट्रावर तर हाये! मंग कशाला पायचे बसायला जागान् बिगा?


या "प्रवरा-एक्सप्रेसची" सर राजधानी एक्सप्रेसलाही नाही!

जलवाहतुक आणि रस्तेवाहतुक यांच अस्सल "कंट्री-स्पेशल फ्युजन"! फ्युजन केवळ संगीतातच असतं म्हणुन कुणी सांगितलं?

खेडोपाड्यातील या वाहनांची सफर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर मग लागा तयारीला आणि निघा प्रवासाला.......

पूर्वप्रसिद्धी - 'मुशाफिरी' (दिवाळी अंक, नोव्हेंबर २०१५)

Saturday 27 February 2016

जाता सातार्‍याला - "माणदेशी भटकंती"

प्रचि ०१

माण देश हा तसा दुष्काळी भाग. कमी पावसाचा प्रदेश. सितामाईच्या डोंगरातुन उगम पावणार्‍या माणगंगा नदीच्या नावाने हा भाग ओळखला जातो. हा भाग जरी दुष्काळाचा असला तरी पर्यटनाच्या बाबतीत मात्र सुकाळ आहे. छत्रपती शिवरायांचे कुलदैवत "शिखर शिंगणापुर" , वर्धनगड, महिमानगड, वारूगड, संतोषगड, भूषणगड इ. दुर्गसंपत्ती तर मायणीचे पक्षी अभयारण्य, पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचा मठ, गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांचा मठ, म्हसवडचा सिद्धनाथ इ. महत्वाची ठिकाणे माण (म्हणजेच दहिवडी) तालुक्यात येतात. माणदेशी भटकंती जरा जास्तच जिव्हाळ्याची होती कारण फलटणपासुन २०-३० किमी तर शिखर शिंगणापुरहुन (फलटणच्या दिशेला) १३ किमी अंतरावर असलेले माझे कुलदैवत आणि माझे गाव "फलटण". माझं गाव फलटण असलं तरी या भागात फक्त कुलदैवताच्या यात्रेनिमित्तच २-३ दिवस जाणे होते आणि जत्रेत व्यस्त असल्याने परीसराची भटकंती होत नाही. म्हणुन मुद्दाम वेळ काढुन केलेली माण देश परिसरातील हि भटकंती. स्मित
पुण्याहुन मायबोलीकर दिपक डि आणि मुंबईहुन अस्मादिक असे दोघांची भटकंती. वाकडहुन लवकर निघुन पहिल्या दिवशी प्रथम "कल्याणगड" अर्थात "नांदगिरीचा किल्ला" त्यानंतर "वर्धनगड" आणि मग "महिमानगड" करून शिखर शिंगणापुर, जावली करून फलटण येथे मुक्काम, दुसर्‍या दिवशी फलटण-दहिवडी मार्गावरील "वारूगड" आणि शेवटी "संतोषगड" असा भटकंतीचा प्लान होता. पण पहिल्याच कल्याणगडने चकवल्याने आणि महिमानगडाने थकविल्याने आम्ही दहिवडीला मुक्काम केला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर निघुन प्रथम शिखर शिंगणापुर, आमचे कुलदैवत जावलीचा सिद्धनाथ करून मग फलटण आणि तेथुन वारूगड व संतोषगड करून पुणे मार्गे मुंबई. वेळेच्या अभावी वारूगडला मनासारखी भटकंती झाली नाही आणि फोटोही काढता आले नाही. त्यामुळे वारूगडला पुन्हा एकदा फेरी होणार. स्मित
(किल्ल्यांची माहिती Trekshitiz.com व शिखर शिंगणापुरची माहिती विकिपिडियावरून साभार)
कल्याणगड अर्थात नांदगिरीचा किल्ला
कल्याणगड हा सातारा विभागात मोडणारा किल्ला आहे. कल्याणगडाचेच दुसरे नाव म्हणजे ’नांदगिरीचा किल्ला’ असे आहे. सातार्‍यापासून अर्ध्या दिवसात हा किल्ला आपण पाहून येऊ शकतो. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहेत. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्यावर असलेली व लांबलचक पसरलेली गुहा होय. फेब्रुवारी - मार्च पर्यंत या गुहेत पाणी असते. गुहेतील मिट्ट काळोखात, गुढगाभर गार पाण्यातून गुहेच्या टोकापर्यंत (दत्त पादुकांपर्यंत) जाण्याचा थरार या किल्ल्यावर अनुभवता येतो.
सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला इ.स ११७८ ते इ.स१२०९ या कालावधीत बांधला गेला असावा.
इ.स १६७३ मध्ये शिवरायांनी सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेतला, त्यातच कल्याणगडाचा देखील समावेश होता. पुढे शिवकालानंतर गडाचा सर्व कारभार प्रतिनिधींकडे सोपवला गेला. पेशव्यांमध्ये व प्रतिनिधींमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यावर हा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स १८१८ मध्ये जनरल प्रिझलरने हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात घेतला.
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

किल्ले वर्धनगड
वर्धनगड छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला आहे. सातरा जिल्ह्यातून जाणार्‍या महादेव डोंगर रांगेवर, भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे. त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर, कोरगाव पासून ७ मैलांवर व साताराच्या ईशान्येस १७ मैलांवर वर्धनगड किल्ला बांधलेला आहे. सातारा - पंढरपूर मार्गावर कोरेगाव नंतर येणारा घाट याच किल्ल्याच्या पदरातून जातो. किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरावरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे. किल्ल्यावरील वर्धनीमातेच्या मंदिरात पंचक्रोशीतील लोकांचा राबता असतो.
अफजलखानाच्या वधानंतर छ्त्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड बांधला. १२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर १६६१ शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते. संभाजी महाराजांच्या वधानंतर ५ में १७०१ मध्ये मोगलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष्य सातार्‍यातील किल्ल्यांकडे वळवले. मोगल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला की ‘‘ बादशहांनी खटावला छावणी करावी, म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील’’. औंरगजेबाने या योजनेला मंजुरी दिली. दि. ८ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभव झाला. यानंतर मोगलांची फौज खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली होती. आज ना उद्या हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्चित होतं म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांतील लोकांना आक्रमणाची आगाऊ कल्पना दिली होती. ज्या लोकांना शक्य होते त्यांनी आपल्या बायका मुलांना किल्ल्यात नेले. नंतर ९ जून १७०१ रोजी वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखाना जवळ पाठवला. त्याने याला सांगितले की ‘‘किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे’’. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केली. खरतर फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळाकाढूपणा होता.मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फतेउल्लाखान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पाहात राहीला, पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकला सुध्दा नाही. फतेउल्लाखानाला मराठयांचा डाव लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला.
त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले, पण यात अनेक मराठे मारले गेले. अनेकजण जखमी झाले. मोगलानी मराठ्यांच्या चाळीस लोंकाना कैद केले. मग मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाडया जाळून टाकल्या. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. दि. १९ जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी ‘मीर ए सामान ’ या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य , चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू ,सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून ‘सादिकगड’ असे ठेवले.
वर्धनगड तीन वर्ष मोगलांच्या ताब्यात होता. सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्लेदार किशोरसिंगला कैद केले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोगलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. इ.स.१७०७ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

वर्धनगडाची अधिष्ठात्री श्री वर्धिनी माता
प्रचि १४

प्रचि १५

किल्ले महिमानगड
महिमानगड हा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मोडणारा किल्ला आहे. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहेत. सातारा - पंढरपूर रस्त्यावर महिमानगड गाव आहे . गावाच्या मागे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर असलेला महिमानगड किल्ला त्याच्या ताशीव कातळ कड्यांमुळे आपले लक्ष वेधून घेतो.
आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर - पंढरपूर - सातारा - वाई - महाड असा व्यापारी मार्ग होता. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले, त्यापैकीच एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते. किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे चालू आहे.
प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

शिखर शिंगणापुर
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. फलटणपासून अग्नेयीस सुमारे ३७ किमी. एवढे अंतर आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटी पासून १,०५० मी. उंचीवर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते.
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे.
शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासुन ते चैत्र पोर्णिमेपर्यंत असते. चैत्र शु. अष्टमीला शंकर व पार्वती यांच्या विवाहाचा मुख्य सोहळ्यांपैकी असतो. तत्पुर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून (हळकुंड ) हळद जात्यावर दळली जाते. चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वर्‍हाडी म्हणून येतात आणि शंभु महादेवाला व पर्वतीमातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभु महादेव मंदिराचे शिखर(कळस) बांधून ते श्री अमृतेश्वर (बळी ) मंदिराचे शिखर(कळस ) यांना पागोटे (सुताची जाड दोरी) बांधले जाते. यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. लग्नासाठी ५५० फूट लांब पागोटे विणले जाते. यांस शंभु महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात आणि रात्री १२ वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभु महादेव आणि पार्वतीमातेचा विवाह सोहळा "हर हर हर महादेव" च्या जयघोषात पार पाडला जातो. चैत्र शुद्ध एकादशीस इंदोरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेत.
चैत्र शुद्ध द्वादशीस, मुंगी घाटातून कावड आणताना चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, "हे म्हाद्या, धाव, मला सांभाळ अशी" असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.
प्रचि २६

प्रचि २७

जावलीचा श्री सिद्धनाथ
आमच्या यात्रेबद्दल (बगाड आणि धडका) या बद्दलचा लेख
ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती ....
मला बी जत्रंला येऊ द्या की रं....

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

किल्ले संतोषगड
सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग. यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र ऊसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. माण तालुक्यात असणार्‍या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस लागतात. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असेही म्हणतात.
प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

कोण म्हणतं निसर्ग फक्त हिरव्या रंगातच जास्त खुलुन दिसतो?
खरं तर त्याच सोनसळी रूपही तितकंच मनमोहक स्मित

प्रचि ४५